निराहार साधक श्री दादा गुरु महाराज आत्मा मालिक ध्यानपीठात
5 वर्षे निरहार, 5 लाख किमी पदयात्रा
कोपरगाव समाचार :- नर्मदा मिशनचे सर्वेसर्वा श्री दादा गुरु महाराज यांचे येत्या शनिवारी, 11 एप्रिल रोजी कोपरगावात आगमन होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून अखंड निराहार (अन्न ग्रहण न करणे) साधना करुन नर्मदा नदी संरक्षण आणि पर्यावरण जागरुकतेचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. त्यांनी आत्तापर्यंत पाच वेळा पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असून अन्नाचा एकही कण अद्याप त्यांनी सेवन केलेला नाही. सिंहस्थ 2028 पर्यंत आठ वेळा नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
निराहार साधक श्री दादा गुरु हे ओम गुरुदेव जंगली महाराज यांच्या दर्शन भेटीला येत आहे. व्रतस्थ साधकाच्या दर्शन व सत्संगाची दुर्मिळ पर्वणी कोपरगावकरांना लाभणार आहे. 11 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता आत्मा मालिक ध्यानपीठ, कोकमठाण येथे आगमन होणार असून भाविकांनी दर्शन व सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष परमानंदगिरी महाराज यांनी केले आहे.
श्री दादा गुरु महाराज नर्मदा मिशनच्या माध्यमातून कार्यरत आहे. नर्मदा नदी क्षेत्रासह देशभरात त्यांना मानणाऱ्या अनुयायांची संख्या मोठी आहे. नर्मदा नदी काठी वृक्षारोपण, जनजागृती, प्रबोधनाचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. अखंड निराहार साधना करुन आतापर्यंत पाच लाख किमी पेक्षा अधिक पदयात्रा पूर्ण केली आहे. मध्यप्रदेश सरकारने श्री दादा गुरु यांच्या असाधारण शारीरिक सहनशक्ती वर वैज्ञानिक संशोधनाला मान्यता दिली होती. नर्मदा जलामधील पोषण तत्वांचा देखील अभ्यास करण्यात आला होता.




