शनिवार रोजी कोपरगावमध्ये स्व.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
कोपरगाव समाचार :--- स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. शनिवार (दि.३१) रोजी दुपारी ०४ वा. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
बुधवार (दि.२८) रोजी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाले आहे.त्यांच्या अकस्मात निधनामुळे राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी, अभ्यासू आणि निर्णयक्षम नेतृत्व हरपले असून संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीच भरून निघणार नाही.
त्यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी राजकारणाविरहीत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच राज्यातील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील अतीव दु:ख झाले आहे. त्यामुळे त्यांना सर्व पक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालात शोकसभा होणार आहे. स्व.अजितदादांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्य जनता केंद्रस्थानी ठेवून काम करतांना सातत्याने महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा विचार केला. त्यांचे अकाली जाणे हि महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी हानी आहे.
त्यांना सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात येणार असून सदर शोकसभेसाठी सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे




