नर्मदा पायी परिक्रमेने जीवनाला दिशा मिळते
कोपरगाव समाचार :-- नर्मदा पायी परिक्रमेने जीवनाला दिशा मिळते, तर वृक्षारोपणातून त्या दिशेला अर्थ मिळतो—याची प्रचिती ब्राह्मणगाव येथे आली. नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर बाबासाहेब कोंडीबा आसने यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पिंपळाच्या रोपाची लागवड करण्यात आली.
हे रोप त्यांचे पुत्र भागिनाथ बाबासाहेब आसने यांनी स्वतः घरी जोपासलेले असून, विद्यार्थ्यांच्या सहभागातून त्याची लागवड करण्यात आली. अध्यात्म आणि पर्यावरण यांची सांगड घालणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
पिंपळ वृक्ष हा दीर्घायुषी, जीवनदायी व पर्यावरणपूरक असल्याने तो भावी पिढीसाठी एक नैसर्गिक ठेवा आहे. विद्यार्थ्यांच्या मनात झाडांबद्दल आपुलकी निर्माण करणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक झालटे , लक्ष्मण आढाव, केशव बनकर व विद्यार्थी उपस्थित होते.





