कृष्णा चांदगुडे यांना भटके विमुक्त समाजाचा कार्यगौरव पुरस्कार जाहीर.
कोपरगाव समाचार ---: तालूक्यातील चास नळी येथील सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना भटके विमुक्त समाजाचा कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ,अशी माहिती राज्यभर कार्यरत असणाऱ्या भटका विमुक्त शोषित समुदाय संघर्ष संघटनेचे ( बी.एस.फोर) अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रा. शिवाजी जोशी ( लातूर) यांनी प्रसिद्धी पत्रक काढून कळविले आहे.
जातपंचायतींच्या मनमानीविरोधातील केलेल्या कामाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.कृष्णा चांदगुडे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जातपंचायत मुठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह आहे. जातपंचायतचे प्रस्थ बहुतांश जातीत असले तरी भटके विमुक्त समाजात त्याचे क्रौर्य व अघोरी शिक्षा भयानक आहे.२०१३ साली आंतरजातीय विवाह केल्यामुळे भटके विमुक्त समाजातील एका गर्भवती महिलेचा तिच्या पित्याने निर्घृण खून केला होता. याच्या पाठीमागे जातपंचायतीचा दबाव आहे, हे चांदगुडे यांनी कार्यकर्त्यांसोबत शोधून काढले होते . त्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दूरदृष्टीतून नाशिक येथून जातपंचायत मुठमाती अभियान सुरू झाले. पुढे ते राज्यभर पोहचले.जातपंचायतीच्या विरोधातील लढ्यामुळे २०१६ ला राज्य सरकारने ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ संमत केला. त्यात चांदगुडे यांचा प्रमुख सहभाग राहिला आहे .चांदगुडे यांच्या प्रयत्नाने भटके विमुक्त समाजातील १९ जातपंचायती बरखास्त करण्यात आल्या आहे. महाराष्ट्रातील सामाजिक इतिहासात हे महत्त्वाचे पाऊल बोलले जाते. आता उघडपणे जातपंचायती बसणे बंद झाले आहे. संविधानाला कमकुवत करणारे न्यायदान व अघोरी शिक्षा करणे बंद झाले आहे.भटके विमुक्त समाजातील अनेक अंधश्रद्धा व कुप्रथा थांबवण्यात त्यांना यश आले आहे.
त्यांच्या या कार्यामुळे भटके विमुक्त समाजातील शेकडो पीडितांना पुन्हा सन्मानाचे जीवन लाभले आहे. चांदगुडे यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे . पुणे येथील साने गुरुजी सभागृह येथे त्यांना हा पुरस्कार रविवार ४ आक्टोंबर रोजी प्रदान करण्यात येईल. सन्मानचिन्ह, स्मृतीपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यांच्या या पुरस्कारामुळे अंनिस कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
“ जातपंचायत विरोधी कामाला सुरुवातीच्या काळात भटके विमुक्त समाजातील काही मूठभर लोकांनी विरोध केला होता. पण हा समाज पुरस्कार देत असल्याने कामाला समाजमान्यता मिळत आहे. अंनिस कार्यकर्ते व जातपंचायत पीडितांचा
हा पुरस्कार आहे.”
-कृष्णा चांदगुडे





