साईड पट्ट्यावरील खड्डे, रस्त्यावर चिखल आणि काटेरी झुडपे; आणखी किती बळी जाणार ?
कोपरगाव समाचार : कोपरगाव–येवला मार्गावरील साईड पट्ट्यांची अत्यंत दयनीय अवस्था वाहनचालकांच्या जीवावर बेतत असून, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे ॲड. नितीन पोळ यांनी केली आहे. रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी काटेरी झुडपे रस्त्यावर आली आहेत. तसेच पावसामुळे साईड पट्ट्यावरील चिखल मुख्य रस्त्यावर येत असल्याने वाहन घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
याबाबत बोलताना ॲड. नितीन पोळ म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी याच मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतरही संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी आवश्यक उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना आवाहन करत म्हटले की, रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर तातडीने मुरूम टाकून खड्डे बुजवावेत तसेच रस्त्यावर आलेली काटेरी झुडपे काढावीत. या किरकोळ कामामुळे अनेक संभाव्य अपघात टाळता येतील आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल.
श्रेयवादावरही त्यांनी उपरोधिक टिप्पणी करत म्हटले की, "रस्त्याच्या एका बाजूचे काम एका विकास पुरुषाने केले, तर दुसऱ्या बाजूचे काम दुसऱ्या कार्यसम्राटाने केले, त्यामुळे श्रेयवादाचाही प्रश्न राहणार नाही. मात्र नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे."
शेवटी त्यांनी सोशल मीडियावरील प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष विकासकामांना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित करत उपरोधिक शब्दांत, "मग रिल बनून चालू द्या कितीही दिवस... आमचाच नेता लै भारी," अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
कोपरगाव–येवला मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अन्यथा लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ॲड. नितीन पोळ यांनी दिला आहे.







