ज्ञान, कौशल्य आणि शिस्त हाच यशाचा मंत्र --अमित कोल्हे
गुणवंत विद्यार्थ्यांचा संजीवनीत गौरव
कोपरगांव समाचार :--झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी काळानुसार स्वतःमध्ये सातत्याने बदल घडवून आणत नवे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कितीही प्रगत झाली तरी तिच्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि योग्य दिशेने वापर करण्यासाठी मानवी ज्ञान, विवेक आणि कौशल्य यांनाच सर्वाधिक महत्त्व आहे. तसेच विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने जगभर कार्यरत असलेल्या संजीवनीच्या माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी अल्युम्नी पोर्टलवर नोंदणी करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलीत संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या ३७ विध्यार्थ्यानी एमएचटी-सीईटी परीक्षेत ९० ते ९९. ९९ पर्सेन्टाईल मिळविले. त्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानवरून अमित कोल्हे बोलत होते. या सोहळ्यास संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या व्यवस्थापकिय संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित होत्या. या परीक्षेत प्रथमेष रवींद्र गोसावी याने ९९. ९९ पर्सेन्टाइल गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला, सिद्धेश प्रशांत क्षत्रिय याने ९९. २० पर्सेन्टाइल गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर शौर्य संतोष थोरात याने ९६. ०८ पर्सेन्टाईल मिळवुन तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.
अमित कोल्हे पुढे म्हणाले की संजीवनी ज्यु. काॅलेजमधुन ११ वी बॅच बाहेर पडली असुन सलग १०० टक्के निकालाची परंपरा राखण्यात पालकांच्या सहकार्याबरोबरच शिक्षकांचे कष्ट महत्वपूर्ण आहेत. संजीवनीच्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील तणाव निघुन जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळासह विविध स्पर्धामध्ये नेहमी सहभाग नोंदवावा, असा सल्ला दिला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मनाली कोल्हे म्हणाल्या की, गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सत्कार केवळ त्यांच्या गुणांचा नसून त्यांच्या समर्पण, दृढनिश्चय आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा गौरव आहे. विध्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांबरोबरच पालकांचे अथक परिश्रम, त्याग आणि अनेक तडजोडी असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या कष्टांची जाणीव कायम ठेवावी. पैसा, पद आणि प्रतिष्ठा ही क्षणभंगुर असते, मात्र ज्ञान ही आयुष्यभर साथ देणारी आणि कधीही न संपणारी संपत्ती आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने चांगले ज्ञानार्जन करून देश आणि समाजासाठी योगदान द्यावेे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डाॅ. राजन शेंडगे , डाॅ. विपुल पटेल, प्रा. रेखा साळुंके आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






