१५ जून पर्यंत संवत्सर पुलावरून वाहतूक सुरु झाली पाहिजे; आ. आशुतोष काळे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
कोपरगाव समाचार -:: राज्यातील प्रमुख शहरांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा जुना मुंबई-नागपूर (एन.एच.७५२आय) महामार्ग शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि प्रवासी यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा रस्ता असल्याने संवत्सर येथे गोदावरी नदीच्या पुलाच्या दुरुस्तीचे काम १५ जून पर्यंत पूर्ण करून पुलावरून वाहतूक सुरु झाली पाहिजे अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
पुलाच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार व्हावे यासाठी आ. आशुतोष काळे यांनी यापूर्वी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या असून शुक्रवार (दि.०५) रोजी स्वतः अधिकारी आणि नागरिकांच्यासमवेत प्रत्यक्ष सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.
दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या या महामार्गावरील संवत्सर येथील गोदावरी नदीच्या पुलाला काही महिन्यांपूर्वी मध्यभागी मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पुलावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. कोपरगाव शहराला जोडणारा तालुक्याच्या पूर्व भागातील हा अतिशय महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि प्रवासी यांना अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. याची दाखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची शासकीय निवासस्थानी भेट घेऊन व सातत्याने पाठपुरावा करून या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी आणला आहे.
या निधीतून साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे कामही सुरु झाले आहे.
परंतु काही दिवसांपासून हे काम संथ गतीने सुरु असल्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला धारेवर धरले. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून हे काम वेळेत पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. कामाचा वेग तात्काळ वाढवून कोणत्याही परिस्थितीत १५ जून पर्यंत पुलावरून वाहतूक सुरु झाली पाहिजे अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला दिल्या आहेत.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






