धरणांनी तळ गाठला; कोपरगावच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम, नागरिकांनी पाणी उकळूनच वापरावे – नगराध्यक्ष पराग संधान
कोपरगाव समाचार:-कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्याने शहरात येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. धरणातून येणारे पाणी साठवण तलावात पोहोचतानाच अत्यंत खराब अवस्थेत येत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पराग संधान, नगरसेवक अनिल आव्हाड आणि संदीप देवकर यांनी नगरपरिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत शहराच्या फिल्टरेशन प्लांट तसेच साठवण तलावाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.पाहणीदरम्यान पाण्याची गुणवत्ता खालावल्याचे स्पष्ट दिसून आले.
प्रशासनाकडून पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक ती प्रक्रिया केली जात असली तरी मूळ स्रोतामधूनच खराब पाणी येत असल्याने फिल्टरेशननंतरही काही प्रमाणात पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.तसेच, पाणी अधिक स्वच्छ करण्यासाठी अतिरिक्त रासायनिक पदार्थांचा वापर केल्यास नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आवश्यक त्या मर्यादेतच प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
जोपर्यंत नवीन रोटेशन येत नाही तोपर्यंत आहे ते पाणी पुरवठा काही प्रमाणात पाणी खराब येऊ शकते याची नोंद नागरिकांनी घ्यावी कारण फिल्टर केल्यानंतर देखील सदरचे पाणी आपल्याला हवे तेवढे फिल्टर होत नाही ही वस्तुस्थिती धरणातील खराब पाण्यामुळे निर्माण झाली आहे.
नगराध्यक्ष पराग संधान यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, सध्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी नवीन रोटेशन येई पर्यंत नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. घरगुती वापरासाठी पाणी शक्यतो उकळून, गाळून आणि स्वच्छ भांड्यात साठवून वापरावे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी पिण्याच्या पाण्याबाबत अधिक दक्षता घ्यावी.
नगरपरिषद नागरिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत व सुरक्षित राहावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.







