संजीवनीची आकांक्षा आता भारतीय नौदलात
मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्याकडून आकांक्षासह पालकांचा सत्कार
कोपरगांव समाचार :-गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आणि अनेकांना घडविणाऱ्या संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या शैक्षणिक परंपरेत एका अभिमानास्पद यशाची भर पडली आहे. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आकांक्षा विक्रम भास्कर हिची भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी निवड झाली आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबातील या विद्यार्थिनीने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी तिच्या सह वडील विक्रम भास्कर व आई सौ.अर्चना भास्कर यांचा सत्कार केला.
देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये संजीवनीचे विद्यार्थी महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. यासोबतच आता संरक्षण आणि राष्ट्रसेवेच्या क्षेत्रातही संजीवनीचे विद्यार्थी आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे आकांक्षाच्या निवडीमुळे अधोरेखित झाले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी आकांक्षा व तिच्या पालकांचे अभिनंदन केले. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. राजेंद्र कापगते, विभागप्रमुख डॉ. प्रसाद पटारे उपस्थित हाते.
सत्कारास उत्तर देताना आकांक्षा म्हणाली की, ‘मी सामान्य कुटुंबातील विद्यार्थीनी आहे. माझे आई-वडील शेतकरी आहेत. आपल्या लेकीने सैन्यदलात जाऊन देशसेवा करावी किंवा पायलट व्हावे, हे त्यांचे स्वप्न होते. आज त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले, याचा मला आनंद आहे. या प्रवासात एक-दोन वेळा अपयश आले, मात्र मी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने अभ्यास केला. शिक्षण घेत असताना घरातील आणि शेतीतील कामांमध्येही हातभार लावला. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने मला नेहमीच सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे आणि अमित कोल्हे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आता सब लेफ्टनंटपदी निवड झाली असली तरी भविष्यात चीफ ऑफ नेव्हल ऑफिसर पदापर्यंत पोहोचण्याचे माझे स्वप्न आहे. आता २९ जून पासून माझं केरळामध्ये ट्रेनिंग आहे.
आकांक्षा हिने मिळवलेले यश हा संजीवनीसाठी अभिमानाचा क्षण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंमध्ये, विशेषतः मुलींमध्ये, मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती प्रत्यक्षात साकार करण्याची क्षमता आहे, याचे आकांक्षा हे प्रेरणादायी उदाहरण आहे. देशसेवेत ती निश्चितच उल्लेखनीय योगदान देईल, असा विश्वास आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांचे एक स्वप्न असते. ते पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी संजीवनी कायम प्रयत्नशील आहे.







