उन्हाळ्यात दिलासा; निळवंडेचे पाणी पोहोचले गावागावातील पाझर तलावांत
कोपरगाव समाचार:-उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव, वेस सोयगाव, अंजनापूर, बहदराबाद, बहादरपूर, मनेगाव, डांगेवाडीसह पंचक्रोशीतील विविध गावांमधील पाझर तलाव निळवंडे धरणाच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरून देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आमदार विवेक कोल्हे यांचे आभार मानले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उन्हामुळे परिसरात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली होती. विहिरींची पातळी घटत असल्याने ग्रामस्थांनी पाझर तलाव भरून देण्याची मागणी आमदार विवेक कोल्हे यांच्याकडे केली होती. नागरिकांच्या अडचणीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधत प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
आमदार कोल्हे यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने जलद कार्यवाही करत परिसरातील साठवण तलावांमध्ये निळवंडे धरणाचे पाणी सोडले. त्यामुळे अनेक गावांतील तलाव पूर्ण क्षमतेने भरले गेले आहेत. याचा मोठा फायदा भूजल पातळी वाढण्यासाठी होणार असून विहिरींना पाणी टिकून राहण्यास मदत मिळणार आहे.
तसेच शेतकरी, नागरिक आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. “आमदार विवेक कोल्हे यांनी नेहमीप्रमाणे जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेत तातडीने निर्णय घेतला. त्यामुळे उन्हाळ्यातील संभाव्य संकट टळले,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.






