राघोबादादा वाड्यास ३.६२ कोटींचा निधी; कोपरगावच्या इतिहासाला नवा श्वास -- पराग संधान
पाठपुरावा केल्याबद्दल मा.आ. स्नेहलता कोल्हे यांना धन्यवाद
कोपरगाव समाचार :--कोपरगाव शहरातील ऐतिहासिक राघोबादादा वाड्यास महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून जतन व दुरुस्ती कामासाठी ३ कोटी ६२ लाख २३ हजार १५० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन होणे ही काळाची गरज असल्याच्या प्रश्नाला शासनाने योग्य न्याय दिल्याबद्दल कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
राघोबादादा वाड्याचे जतन व दुरुस्ती कामांना शासन निर्णयान्वये सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यानुसार संबंधित कामांसाठी ३ कोटी ६२ लाख २३ हजार १५० रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोपरगाव शहरातील या ऐतिहासिक वाड्याची दुरुस्ती राज्य शासनामार्फत करण्यात येऊन त्यास अजरामर करण्यात येणार आहे. या वाड्याची ख्याती संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रभर पसरलेली आहे.
कोपरगावच्या मा. आ. स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगावातील पौराणिक व ऐतिहासिक अशा राघोबादादा वाड्याच्या संवर्धनासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. सदर ऐतिहासिक वास्तूचे दुरुस्ती व जतनाचे काम उत्तम होण्यासाठी, या कामासाठी निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार करून वित्तीय मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या या मागणीस शासन व पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल संधान यांनी आभार मानले आहे.




