विद्यार्थ्यांमधिल समर्पणाची भावना त्यांना यशस्वी बनविते - सम्राट वर्मा
संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
कोपरगांव समाचार :-- मी अनेक शाळांमध्ये जाण्याचा अनुभव घेतला आहे, परंतु संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजसारखी शिस्त , काटेकोर दिनचर्या, समर्पणाची भावना आणि देश भक्तीचे संस्कार अन्यत्र क्वचितच पाहायला मिळाले. सैनिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम असतोच, परंतु तो राष्ट्रप्रेमाने ओतप्रेत भरलेला असतो आणि जबाबदार नागरीक घडण्याच्या प्रक्रियेतुन जात असतो. येथिल विद्यार्थ्यांमधिल समर्पणाची भावना त्यांना यशस्वीतेकडे निश्चित घेवुन जाईल असा विश्वास वाटतो, असे मत कृष्णा एन्झायटेकचे मॅनेजिंग डायरेक्टर सम्राट वर्मा यांनी व्यक्त केले.
संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या २६ व्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारीतोषिक वितरण समारंभात श्री वर्मा प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी व्यासपीठावर नॉन अकॅडमिक डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर, कॅम्पस अॅडमिन विजय भास्कर, असिफ सय्यद, उपप्राचार्य बी. एल.सोमासे, आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्राचार्य दरेकर यांनी वार्षिक अहवाल सादर करताना विद्यार्थी व शिक्षकांनी राज्य व देश पातळीवर विविध क्षेत्रात स्थापित केलेल्या कीर्तिमानांचा उहापोह केला.
श्री वर्मा पुढे म्हणाले की संजीवनी सैनिकी शाळेच्या ब्रासबॅण्ड टीमने दिल्ली येथे सादरीकरण केले, तेव्हा मी दूरदर्शनवर थेट लाईव्ह पाहत होतो. ग्रामीण भागातुन आलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट वादन कौशल्याने, शिस्तबध्द संचलनाने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधुन घेतले. संजीवनी सारख्या ग्रामीण परिसरातील ब्रासबॅण्ड पथकाने राष्ट्रीय स्तरावर बाजी मारणे ही केवळ संस्थेसाठीच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सुमित कोल्हे म्हणाले की दिल्ली येथे राष्ट्रीय ब्रासबॅण्ड स्पर्धेत देशातील ७६४ शाळांमधील ११०६३ स्पर्धकांना हरवुन आपले विद्यार्थ्यांनी संघर्ष , संयम आणि सातत्याच्या जोरावर राजधानित विजयी झेंडा फडकविला. या पाठीमागे संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेबरोबरच विद्यार्थ्यांची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन , अर्थात आमचे सुरक्षा रक्षक ते प्राचार्य आणि पालक यांचे मोठे योगदान आहे. काही पालक दिल्लीला येवुन दिल्लीकरांना ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ हा सादरीकरणाच्या वेळी नारा ऐकविला. विशेष म्हणजे आपल्याच विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाच्या वेळी भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाने तिरंगा फडकविला होता, हा अप्रत्यक्ष अभिनंदनाचा वर्षावच होता, असे वाटते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातिल योजनांचीही माहिती दिली.
व्यावसायिक रंगभूमीला साजेसा रंगमच, उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था व लाईट इफेक्टस्, विध्यार्थ्यांनीच सादर केलेल्या संगीतमय रचना, रसिक प्रेक्षकांकडून प्रत्येक सादरीकरणानंतरची दाद, इत्यादी बाबींमुळे सांस्कृतिक कार्यक्रम संस्मरणीय ठरला, असे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले. कलाकारांनी सादर केलेली बॉलीवुड संकल्पनेवर आधारीत विविध अदाकारी मुख्य आकर्षण ठरले.




