कोपरगाव तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करणार --- गटविकास अधिकारी
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी
महाराष्ट्र शासनामार्फत १७ सप्टेंबर पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून या अभियानाची कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीं मध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी दिली.
१७ सप्टेंबर पासून सुरू होणारे हे अभियान ३१ डिसेंबर पर्यंत चालणार आहे.या अभियानाचा उद्देश सुशासन युक्त पंचायत तयार करणे,ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे ,गावे जलसमृद्ध स्वच्छ व हरित करणे,मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे ,गाव पातळीवरील संस्था सक्षम करणे,उपजीविका विकास करणे व सामाजिक न्याय देणे, लोकसहभाग
व श्रमदानाच्या माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
याबाबत प्रशासनामार्फत ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करण्यात येत असून अधिकारी व कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्याची तयारी सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग मिळवून "आदर्श ग्रामपंचायत" घडविण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे अंमलबजावणी व सनियंत्रण ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखालिल एक समिती करणार आहे. तसेच प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार साठी ग्रामपंचायतीची निवड करण्याकरिता जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी तर तालुकास्तरावर गटविकास अधिकारी हे मूल्यमापन समितीचे अध्यक्ष म्हणून काम करतील यासाठी
पुरस्काराची रक्कम तालुकास्तर प्रथम १५ लक्ष रुपये ,द्वितीय १२ लक्ष रुपये,तृतीय ८ लक्ष रुपये,
जिल्हास्तर प्रथम ५० लक्ष,द्वितीय ३० लक्ष,तृतीय २० लक्ष,
विभाग स्तर प्रथम १ कोटी,द्वितीय ८० लक्ष,तृतीय ६० लक्ष,
राज्यस्तर प्रथम ५ कोटी,द्वितीय ३ कोटी ,तृतीय २ कोटी ,पुरस्कार असणार असल्याची माहितीही गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी दिली.







