२२ वर्षांनंतर पुन्हा भरली आठवणींची जिवंत झालेली शाळा.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
जुन्या धूळभरलेल्या बाकांवर पुन्हा एकदा आठवणींची पालवी फुलली. रयत शिक्षण संस्थेच्या चासनळी येथिल मा. द. तिडके पाटील विद्यालयात २००२-०३ या शैक्षणिक वर्षात दहावी पास झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेचा वर्ग भरवला – पण यावेळी अभ्यासासाठी नव्हे, तर जुन्या आठवणींना स्पर्श करण्यासाठी, जुन्या मित्रांना मिठीत घेण्यासाठी.
कार्यक्रमाची सुरुवात देवतांच्या प्रतिमांची पूजा आणि दीपप्रज्वलनाने झाली. अध्यक्षस्थानी शिक्षक बोधे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मेजर रावसाहेब गडाख उपस्थित होते. .
. जुन्या मित्रांची मिठी, डोळ्यातून ओघळणाऱ्या भावनांचा पाझर, आणि आठवणींची गोडसर कसरत सर्व काही काही क्षणांसाठी काळाच्या ओघाला थांबवून गेलं. एकेक चेहरा पाहून "अरे तू किती बदललास!" म्हणत पुन्हा जुनं बालपण जगायला मिळालं.
कोणी डॉक्टर झालं, कोणी शिक्षक, कोणी सैन्यात गेलं, कोणी परदेशात स्थायिक झालं – पण त्या दिवशी सगळे पुन्हा एकदा ‘दहावीचा विद्यार्थी’ झाले होते. "ओळख परेड" घेऊन एकमेकांच्या वाटचालीची माहिती घेतली गेली आणि हसत-हसत आठवणींचा खजिना उलगडत गेला.
शिक्षकही यावेळी आपल्या विद्यार्थ्यांना पाहून भारावले. हंडाळ सर, काळे सर, पाईक सर, जाधव सर, वैद्य सर, अंबिलवादे सर, पवार सर, बागल सर, खंडीझोड सर, जोशी मॅडम, बागुल मॅडम – यांचं प्रेमळ स्वागत करण्यात आलं. मुख्याध्यापक मांडवे सर आणि संपूर्ण कर्मचारी वर्गाने कार्यक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
सूत्रसंचालन सौ. मालती नागरे व मनीषा वाणी यांनी अत्यंत संवेदनशीलतेने केलं.
कार्यक्रमानंतर एक भावनिक निर्णय घेण्यात आला उरलेल्या निधीतून त्याच बॅचमधील मच्छिंद्र माळी यांच्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत करण्यात आली. ही केवळ मदत नव्हे, तर आपुलकीचं, एकतेचं आणि माणुसकीचं प्रतीक ठरली.
कार्यक्रमाच्या अखेरीस स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था होती, पण त्या जेवणासोबतच आठवणींचं पानही प्रत्येकाच्या मनात कायमचं उरलं.
हा एक दिवस नव्हता, ती होती आठवणींची पुन्हा एकदा जिवंत झालेली शाळा.





