महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन उत्साहात साजरा
कोपरगाव समाचार :- महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि मराठी साहित्याचे आद्य प्रेरणास्थान असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा 806 वा अवतार दिन भाद्रपद शुद्ध द्वितीया शनिवार दि. 12 सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तिभावात महाप्रदासाचे वाटप करत छ. शिवाजी महाराज चौक कोपरगाव येथे साजरा करण्यात आला.
यावेळी श्री. चक्रधर स्वामी महाराज आश्रमचे मोठे बाबा राजधर बाबा महानुभाव, खासदार भाऊसाहेब वाकचौरे,गोदावरी दूध संघांचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,डॉ.हिरालाल महानुभाव,डॉ. निखिल महानुभाव,दिलीप दारुणकर,पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, नगरसेवक विक्रमदित्य सातभाई,चांगदेव कातकडे,भाजपा नेते रामदास खैरे, उपसरपंच विवेक परजने,रवींद्र पाठक, अविनाश पाठक, रवींद्र कथले, संदीप देवकर, राजेंद्र बापू जाधव,दिनार कुदळे, संजय उदावंत, ज्ञानेश्वर परजने, त्रंबक परजने, बापूसाहेब बारहाते, आदिनाथ ढाकणे,इरफान शेख, गणेश कानडे, राजेंद्र साळूंके,मोहन सांगळे, श्री. चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा मठपती, श्री. चक्रधर स्वामी माध्यमिकच्या वंदना मराठे,श्री. चक्रधर स्वामी डी एड कॉलेज च्या थोरे मॅडम, श्री. चक्रधर स्वामी आय टी आयचे प्राचार्य वाकचौरे सर, विजया थोरे, लॉ कॉलेज चे प्राचार्य राय सर, नामदेव उबाळे, रेणुका सुरासे ,करुणा सोनवणे आदिसह मोठ्याप्रमाणावर भाविक उपस्थित होते.
यंदा हा पावन अवतार दिन दि. 12 सप्टेंबर 2026 रोजी सर्व महानुभाव आश्रम व मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शके ११४२ मध्ये भाद्रपद शुद्ध रविवारी गुजरातच्या भडोच येथे श्री चक्रधर स्वामींचा अवतार झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव हरिपाळदेव होते. त्यांनी वैदिक कर्मकांडाला नाकारून समाजातील जातिभेद, स्त्री-पुरुष भेदभावाला विरोध केला आणि सर्वांना मोक्षाचा समान अधिकार आहे हा क्रांतिकारी विचार दिला. त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राचे पहिले समाजसुधारक मानले जाते. त्यांच्या भक्ती प्रेरणेतूनच मराठीतील पहिला चरित्रग्रंथ 'लीळाचरित्र' निर्माण झाला, ज्यामुळे मराठी साहित्य परंपरेची खरी सुरुवात झाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील महानुभाव पंथीय व उपदेशी बांधवाच्या पुढाकारणे हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. निखिल महानुभाव यांनी केले.तर आभार डॉ. हिरालाल महानुभाव यांनी मानले.
"सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी 806 वर्षांपूर्वी समतेचा, मानवतेचा आणि अहिंसेचा संदेश दिला. त्यांनी जात-पात, उच्च-नीच हा भेद नष्ट करून सर्व जीवांना मोक्षाचा अधिकार दिला. आजच्या काळात त्यांचे विचार अधिक गरजेचे आहेत. सर्व भाविकांनी त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करावे आणि धर्माचे पालन करावे. सर्वांना अवतार दिनाच्या दंडवत शुभेच्छा. -
राजधरबाबा महानुभाव, मोठे बाबा, श्री चक्रधर स्वामी महाराज आश्रम संवत्सर
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे केवळ महानुभाव पंथाचे संस्थापक नाहीत तर ते महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचे जनक आहेत. मराठी भाषेला समृद्ध करण्यात आणि समाजात समतेची बिजे रोवण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आपण सर्वांनी पुढे नेला पाहिजे. सर्व भाविकांना अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- खा. भाऊसाहेब वाकचौरे








