कोपरगाव तालुक्यात जूनमध्ये केवळ ३८ टक्के पाऊस; घाईघाईने पेरणी टाळा -- कृषी अधिकारी मनोज सोनवणे
कोपरगाव समाचार :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती कोपरगाव येथे कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्नील वाळूंज, कीटकशास्त्रज्ञ भरत दवंगे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी सचिन कोष्टी, तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी सखी महिला आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी बाजरी व सोयाबीन पीक स्पर्धेत उल्लेखनीय उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी कृषी दिनाचे महत्त्व, वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील योगदान तसेच एल निनोच्या पार्श्वभूमीवर पीक नियोजनाची आवश्यकता स्पष्ट केली.
ते म्हणाले की, कोपरगाव तालुक्यात जून महिन्यात सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने कोरड्या जमिनीत पेरणी न करता किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. तसेच निविष्ठांची खरेदी करताना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
गटविकास अधिकारी स्वप्नील वाळूंज यांनी एल निनोच्या संकटावर मात करण्यासाठी योग्य पीक निवड, सूक्ष्म सिंचनाचा वाढता वापर आणि कमी कीटकनाशकांच्या साहाय्याने दर्जेदार उत्पादन घेण्याच्या त्रिसूत्रीवर भर दिला.
कीटकशास्त्रज्ञ भरत दवंगे यांनी उशिरा झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन व मका पिकांच्या योग्य वाणांची निवड, पेरणी तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन तसेच डाळिंब पिकातील कीड-रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसनही केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकृषी अधिकारी ठाकरे यांनी केले, तर उपकृषी अधिकारी सुनील घारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.









