लोडशेडिंगने येसगाव,खिर्डी गणेश , ब्राम्हणगाव परिसर हैराण
लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष
कोपरगाव समाचार :-कोपरगाव तालुक्यातील येसगाव सबस्टेशन खिर्डी गणेश उपकेंद्रांतर्गत व ब्राम्हणगाव सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार सिंगल फेज वीजपुरवठ्यावर आपत्कालीन (इमर्जन्सी) लोडशेडिंग लागू करण्यात आल्याने शेतकरी, विद्यार्थी, दूध उत्पादक आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिंगल फेज फिडरचा वीजपुरवठा रात्री ११ वाजल्यानंतर सुरळीत केला जात आहे. मात्र, वाढत्या लोडशेडिंगमुळे शेतीसह दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
विशेष म्हणजे, येसगाव,खिर्डी गणेश, ब्राम्हणगाव परिसरात सध्या बिबट्याचा वावर असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात शेतात वस्ती करून राहणा-या शेतकऱ्यांमध्ये तसेच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वीज नसल्याने अनेक ठिकाणी रस्ते आणि शेत परिसर अंधारात बुडत असून संभाव्य दुर्घटनांचा धोका वाढला आहे.विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. सायंकाळच्या वेळेत वीज नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. दूध उत्पादकांनाही दूध संकलन अन्य कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनाही उकाडा आणि अंधारामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार महावितरणकडे पाठपुरावा केला असला तरी त्याकडे दुर्लक्ष होत असून लोकप्रतिनिधींच्या मागण्यांनाही अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.येसगाव सब स्टेशन खिर्डी गणेश सह ब्राम्हणगाव सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात लोडशेडिंग तातडीने कमी करून नियमित वीजपुरवठा सुरू करावा, विशेषतः बिबट्याच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळच्या वेळेतील वीजपुरवठा अखंड ठेवावा अशा मागणीचे निवेदन येसगाव,खिर्डी गणेश ग्रामस्थांनी खिर्डी गणेश सबस्टेशन ला दिले असून लोडशेडींग बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उप तालुका प्रमुख सचिन आसने सह ब्राम्हणगाव ग्रामस्थांनी दिला आहे.
यामध्ये अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.






