कोपरगाव मार्केट कमिटीच्या निष्काळजीपणावर संताप"
जिवंत वासराचे लचके तोडणाऱ्या कुत्र्यांचा थरार; जबाबदार कोण?"
कोपरगाव समाचार :- कोपरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारात मुक्या जनावरांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. बाजार परिसरात दर सोमवारी काही शेतकरी लहान वासरे जाणीवपूर्वक सोडून जातात त्यानंतर भटके कुत्रे या वासरांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.
याबाबत ॲड. विद्यासागर शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, बाजार समितीचे सचिव श्री. रणशूर यांना अनेक वेळा फोन करून तसेच फोटो पाठवून ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र, कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही.
आज मंगळवार सकाळी एका लहान वासरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याचे लचके तोडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या त्या मुक्या जनावराकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दर सोमवारी चार ते पाच वासरे अशाच प्रकारे बाजार परिसरात सोडली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने जनावरांच्या संरक्षणासाठी कोणती उपाययोजना केली आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
या गंभीर प्रकारामुळे मुक्या जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाविरोधात न्यायालयात दावा दाखल करून कोपरगाव येथील जनावरांचा बाजार कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा ॲड. विद्यासागर शिंदे यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणात बाजार समिती प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही तर
जनावरांच्या बाजारात दर सोमवारी लहान वासरे सोडून दिली जात असल्याचे प्रकार वारंवार घडत असून, त्या वासरांवर भटके कुत्रे हल्ला करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर बाजारातील सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर झिरो पोलीस तैनात असतात. मात्र, बाजार परिसरात सोडून दिलेल्या लहान वासरांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मुक्या जनावरांवर हल्ले होत असताना त्यांना संरक्षण देण्यासाठी किंवा संबंधित यंत्रणेला तातडीने माहिती देण्यासाठी कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे.
यामुळे जनावरांच्या बाजारातील व्यवस्थापन, बाजार समिती प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुक्या जनावरांचे हाल थांबवण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







