वादळाच्या तडाख्यात घरे, फळबागा उद्ध्वस्त; प्रशासनाला तत्काळ कारवाईच्या सूचना
कोपरगाव समाचार:--कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान घडवून आणले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे अनेक घरांची पत्रे उडाली, तर काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. अनेक कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य उघड्यावर पडले असून फळबागा, डाळिंब पिके तसेच साठवणुकीसाठी ठेवलेला कांदाही मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.
वादळामुळे अनेक गावांमध्ये झाडे उन्मळून पडल्याने विजेचे खांब वाकले आणि वीजवाहिन्या तुटल्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
घडलेल्या नुकसानीची माहिती मिळताच आमदार आशुतोष काळे यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्तांना शासनाकडून योग्य ती मदत आणि नुकसानभरपाई मिळावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“मतदारसंघातील कोणताही शेतकरी किंवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहू नये. कोणताही भेदभाव किंवा दिरंगाई न करता त्वरित पंचनामे पूर्ण करावेत,” अशा स्पष्ट सूचना आ. आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.





