कोपरगावची चिमुकली कवयित्री रेवतीची राष्ट्रीय झेप; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
कोपरगाव समाचार :--कोपरगावच्या साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या बालकवयित्री कु.रेवती संदीप चव्हाण हिचा अल्पवयात राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला असून कमी वयातील बालकवयित्री म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची मानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच तिच्या “कलाकुंज” या बालकविता संग्रहाच्या प्रकाशनाबद्दल विविध मान्यवरांकडून तिचा गौरव करण्यात आला.
अलीकडेच .नामदार दादा भुसे,शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते रेवतीचा विशेष सत्कार करून तिला शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी तिच्या साहित्यिक प्रतिभेचे आणि राष्ट्रीय स्तरावरील यशाचे कौतुक करण्यात आले.
कु.रेवती ही श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल, कोपरगाव येथील गुणवंत विद्यार्थिनी असून अल्पवयातच आपल्या काव्यप्रतिभेच्या जोरावर साहित्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्यात तिने यश मिळविले आहे. तिच्या कवितांमध्ये बालमनातील निरागसता, सामाजिक जाणीव, संस्कारमूल्ये आणि सर्जनशील विचार यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो.
तिच्या “कलाकुंज” या बालकविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा सातारा येथे आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मोठ्या उत्साहात पार पडला होता. या साहित्यिक व्यासपीठावर झालेल्या प्रकाशनामुळे रेवतीच्या प्रतिभेला राज्यभर विशेष ओळख मिळाली.आजवर तिला विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक मंचांवर अनेक पुरस्कार, प्रशस्तीपत्रे आणि सन्मानचिन्हे प्राप्त झाली असून बालकवयित्री म्हणून तिने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. तिच्या साहित्यिक कार्याची माहिती, कविता, मिळालेले सन्मान आणि उपक्रमांची माहिती तिच्या अधिकृत वेबसाईटवर ही उपलब्ध असून,ती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.




