गॅस दरवाढीविरोधात कोपरगाव काँग्रेस आक्रमक
तहसीलदारांना निवेदन देऊन दरवाढ मागे घेण्याची मागणी
कोपरगाव समाचार:--केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे एलपीजी गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून, यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी आणि वाढीव किमती त्वरित कमी करण्याच्या मागणीसाठी कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी कोपरगाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या 'पठाणी लुटी'चा तीव्र शब्दांत निषेध केला. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुख्य यूपीए सरकारची तुलना: डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढूनही सबसिडीच्या माध्यमातून सर्वसामान्यांवरील बोजा वाढू दिला नव्हता. ४०० रुपयांना मिळणारे सिलेंडर आज ९०० रुपयांच्या पार गेले आहे.नवे नियम व जाचक अटी: सिलिंडर बुकिंगचा कालावधी १५ दिवसांऐवजी एक महिना करण्यात आल्याने गृहिणींना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती १९०० रुपयांवर गेल्या असून त्याचे रेशनिंग केले जात आहे. याचा थेट परिणाम हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमतींवर होत असून कामगार, नोकरदार आणि मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडले आहे.
यावेळी बोलताना नितीन शिंदे म्हणाले की, "एकीकडे महागाईने जनता होरपळत असताना दुसरीकडे गॅसच्या किमती वाढवून सरकार सर्वसामान्यांची लूट करत आहे. ही दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास काँग्रेस स्टाईलने आंदोलन छेडले जाईल."यावेळी कोपरगाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन शिंदे, विजय सुधाकर जाधव, विष्णू पाडेकर, ज्ञानेश्वर भगत, रौनक अजमेरे,शब्बीर भाई शेख, कैलास पंडोरे पैलवान, मझर शेख यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




