ब्राम्हणगावचा वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन
शेतकऱ्यांचा इशारा, पिके धोक्यात
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने याचा मोठा फटका शेती पिकांना बसत असुन शेतकऱ्यांना त्यांची पिके जगविणे कठीण झाले आहे.पाणी असुनही केवळ वीज सुरळीत येत नसल्यामुळे शेती पिके कोमेजली आहे.विज पुरवठा सुरळीत न झाल्यास ब्राम्हणगाव सब स्टेशन समोर शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ब्राम्हणगाव
येथील शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक सचिन असणे यांनी दिला आहे.
कोपरगाव तालुक्यात सध्या पावसाने मोठी उघडीप दिल्याने ऐन जोमात असलेली सोयाबीन,मका,मुग, कापुस पिके पाण्याअभावी कोमजल्याने यांचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला बसणार असून पिकांना पाणी देणे नितांत गरजेचे आहे.गावात सब स्टेशन असुनही वीज पुरवठा दहा - दहा मिनिटाला खंडित होतो खंडित होणा-या वीज पुरवठ्याला शेतकरी वैतागले असून ज्या उद्देशाने तालुक्याच्या आजी ,माजी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून हे सब स्टेशन येथे केले वारंवार खंडित वीजपुरवठा व पूर्ण दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने त्यांचा उद्देश असफल होत असल्याचे दिसते.. तरी संबंधित अधिकारी यांनी सब स्टेशनला उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला गांभीर्याने घेत वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा कोणत्याही क्षणी आंदोलन छेडले जाईल व होणा-या परिणामांना सर्वस्वी वीज वितरण कंपनी जबाबदार राहील असेही सचिन आसणे यांनी म्हटले आहे.





