कोपरगावात पोलिसांचा धाक झाला कमी ?
पुन्हा दोन गटात राडा
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव शहरांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे नेहमीच विविध ठिकाणी टोळी युद्ध बघायला मिळत आहे कोपरगाव शहरातील आयटीआय कॉलेज जवळ काही किरकोळ कारणाने दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती त्या घटनेला चार दिवस होत नाही तोच आता कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागामध्ये पुन्हा एकदा दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे.
याबाबत माहिती अशी की,कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागात काल दिनांक ( २७ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत २ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन गटांमध्ये काही कारणास्तव झालेल्या या हाणामारीत लाकडी दांडके, काही लोखंडी बनावटीचे हत्यार घटनास्थळी दिसून आले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सदर घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यातील एका गटाकडून अतुल देविदास आव्हाड (वय १९, रा. गजानन नगर) यांनी फिर्याद दाखल केली असून, त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी नामे १.कालू आप्पा २.सोन्या आव्हाड ३.सागर पंडोरे ४. शुभम आढाव ५. नितीन हमरे ६.अविनाश गीते ७. अंकुश ८. सोनू बोडखे तसेच इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुस-या गटाकडून अनिल विनायक आव्हाड (वय ३८, रा. मोहनीराज नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नामे अतुल आव्हाड आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत. हाणामारीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांनी दोन्ही गटांच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेनंतर मोहनीराज नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत असून, लवकरच या हाणामारीमागील कारण उघड होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
कोपरगाव शहरामध्ये याप्रकारे हाणामारीचे प्रकार वाढत असून पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक नसल्याचे यावेळी बोलले जात असुन हाणामारी होतात व किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन पुढील गुन्ह्यात तेच आरोपी सक्रिय होतांना दिसतं आहेत,त्यामुळे या प्रकाराच्या गुन्हांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करून, वचक निर्माण करणे गरजेचे झाले आहेत,
शहरातून मोठ्या स्वरूपात दहशत निर्माण करत जर या प्रकारे खुल्या पध्दतीने हत्यारे वापरण्यात येत असेल तर नक्कीच कोपरगाव शहरामध्ये मोठ्या स्वरूपाची गुन्हेगारी वाढू शकते, याचेच लोन ग्रामिण भागातही पसरु शकते व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोपरगाव तालुक्यात वाढू शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे.


.jpg)






