नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या ! कामे करायची नसेल तर राजीनामे द्या --- आ..आशुतोष काळे
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
सर्वसामान्य नागरीकांना पक्ष नसतो त्यामुळे त्यांच्याबाबत अजिबात राजकारण होता कामा नये.नागरीकांचे प्रश्न सुटणे गरजेचे असून त्यांचा तोटा होणार नाही याची काळजी घ्या.शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना कसा मिळवून देता येईल अशा पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न करा.
गावांतर्गत राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतात. यामध्ये पंचायत समितीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी न पडता गावातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या जर नागरीकांची कामे करायची नसेल तर राजीनामे द्या अशी तंबी आ.आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या कामचुकार अधिकाऱ्यांना व ग्रामसेवकांना दिली.कोपरगाव पंचायत समितीतील पशु संवर्धन विभाग व शासकीय पशु पैदास केंद्र (वळूमाता) ह्या विभागातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पंचायत समिती कार्यालयात जनता दरबार घेतला.याप्रसंगी तालुक्यातील अनेक गावातील नागरीकांनी ग्रामसेवकांबद्दल आपल्या तक्रारी मांडल्या.त्यावेळी त्या तक्रारी सविस्तरपणे जाणून घेवून त्याबाबत संबंधित ग्रामसेवकाकडून माहिती घेतली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबारात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तालुक्यातील जनतेच्या समक्ष कामचुकार अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
यावेळी ग्रामीण भागातून नागरीक आपल्या समस्या घेवून मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समस्यांमध्ये सर्वात जास्त प्रश्न घरकुलांचे होते. त्याचबरोबर जल जीवन योजनेचे काम, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचीकायमस्वरूपीनेमणूक,रस्त्यांचे प्रश्न,आदिवासी बांधवाना घरकुल मिळावे, आरोग्य विभागाच्या समस्या, नवीन अंगणवाडी मंजूर करणे व जुन्या अंगणवाडी नूतनीकरण करणे, कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा, विवाह नोंदणी वेळेवर केली जात नाही,स्मशानभूमी, शिक्षण विभाग, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न तसेच कित्येक कोटींचा विकास निधी अखर्चित आदी प्रश्नांबाबत नागरिकांनी आपल्या समस्या या जनता दरबारात आ.आशुतोष काळे यांच्यापुढे मांडल्या.
त्यावेळी आ. आशुतोष काळे यांनी तक्रारदार नागरिक व सबंधित ग्रामविकास अधिकारी यांना समोरासमोर घेवून अनेक नागरीकांच्या समस्या जागेवरच सोडविल्या.शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना कसा मिळवून देता येईल अशा पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न करा. योग्य वेळी कामाचा निपटारा झाला पाहिजे. चुकीचे काम करू नका. ज्या त्या गोष्टी वेळेवर झाल्या तर जनता दरबार घ्यायची गरजच पडणार नाही.आज ज्या नागरीकांनी आपल्या समस्या या जनता दरबारात मांडल्या आहेत त्यांच्या समस्यांच्या लेखी अर्जाची एक प्रत सबंधित अधिकाऱ्याला देण्यात येणार असून हे प्रश्न सुटले, का नाही सुटले याची मी स्वत: शहनिशा करणार आहे. त्यामुळे पुढच्या जनता दरबारात या नागरीकांच्या तक्रारी पुन्हा येणार नाही याची गांभीर्याने काळजी घ्या असा सूचनावजा ईशारा आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिला. प्रास्तविक पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे यांनी केले तर आभार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी मानले.यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी, विविध विभागांचे प्रमुख, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औताडेंनी मानले आ.काळेंचे आभार
[ पोहेगावचे ग्रामविकास अधिकारी बेकरी व्यवसायासाठी ना हरकत दाखला देत नाही अशी कैफियत पोहेगावच्या रहिवासी सौ.अश्विनी किरण औताडे यांनी जनता दरबारात आ.आशुतोष काळे यांच्यापुढे माडंली. त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी पोहेगावचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र टिळेकर यांना त्याबाबत खुलासा मागितला.त्यावेळी मी दाखला देवू शकत नाही असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली असता आ.आशुतोष काळे यांनी त्यांना चांगलेच खडसावत सबंधित महिलेला याच ठिकाणी ना हरकत दाखला द्या. तुम्हाला वाहनाची व्यवस्था उपलब्ध करून देतो तुम्ही तुमचे दफ्तर घेवून या असे सांगितले त्यावेळी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र टिळेकर यांनी उद्याच सौ.अश्विनी किरण औताडे यांना बेकरी व्यवसायासाठी ना हरकत दाखला देतो असे सांगितले. त्यामुळे सौ.अश्विनी किरण औताडे यांचा मोठा प्रश्न जनता दरबाराच्या माध्यमातून सुटल्यामुळे त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले.]



.jpg)




