पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे पोहेगावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
तत्काळ पोलिस चौकी चालु कराकोपरगाव (लक्ष्मण वावरे )
पोलिसांचा वचक न राहील्याने पोहेगांव येथे गेल्या काही दिवसापासून अवैध धंदे व चोऱ्या वाढल्या हे कमी की काय आता तर दिवसाढवळ्या हातात नंग्या तलवारी ,गावठी कट्टे घेऊन बाजारपेढेत दहशत माजवत दरोडे टाकून व्यवसायिकांना जखमी केले जाते. हे केवळ कायमस्वरूपी पोलीस दूरक्षेञ बंद असल्यानेच होत आहे..
अवैद्य धंदे व चोऱ्यामार्यांना आळा घालण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशन ने तातडीने पाऊले उचलावीत. गावात दिवसाढवळ्या नंग्या तलवारी दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यांमध्ये पोलीस दूरक्षेत्र सुरू नसल्याने भीती राहिली नाही. आता याविषयी जनतेचा उद्रेक होण्याअगोदर अवैद्य धंदे व वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोहेगांव पोलीस दुरक्षेत्र तातडीने सुरू करावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी निवेदन पाठवले आहे.
२००९ पूर्वी घरफोड्या व अवैद्य धंदेरोखण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक विश्वासराव नागरे यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पोलीसदुरुक्षेत्र मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुरावर यश आले २००९ साली पोलीस दूरक्षेत्र सुरू झाले. २२ पोलीस कर्मचारी या दुरक्षेत्राला मंजूर करण्यात आले होते.विना मोबदला ग्रामपंचायतीने ६०० स्क्वेअर फुट हॉल यासाठी दिला.तिथे पोलीस स्टेशनचा बोर्ड लावण्यात आला मात्र काही दिवस सुरू राहिल्यानंतर ते बंद करण्यात आले. पोहेगाव दुरुक्षेत्राला पोलीस नियुक्त दाखवून त्यांचा वापर इतरत्र ठिकाणी करण्यात येऊ लागला. केवळ तीनच वर्ष हे दुरक्षेत्र चालू राहिले व नंतर बंद झाले. ते आजपर्यंत बंदच आहे.पोहेगाव हे बाजारपेठेचे गाव असल्यामुळे चोऱ्या वाढल्या. परिसरातील दोन एटीएम चोरट्याने फोडले. अवैद्य धंदे फोपावले. ग्रामस्थांमध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले. हे सर्व टाळण्यासाठी व पोलीस दूरक्षेत्र सुरू होण्यासाठी तत्कालीन सरपंच अमोल औताडे व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी उपोषण व रस्ता रोको आंदोलन केली. तात्पुरत्या स्वरूपात तेव्हा दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती शिर्डी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत करण्यात आली मात्र ती काही दिवस राहिली नंतर मात्र हे पोलीस दूरक्षेत्र पुन्हा बंद राहू लागले .
शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने अपुरे पोलीस कर्मचारी असल्याचे कारण देत प्रत्यक्ष नियुक्त्या पोहेगावला करून त्यांचा वापर दुसरीकडे करण्यात येऊ लागला.
आता पुन्हा परिसरात अवैध धंदे चोऱ्यामाऱ्या यांचा सुळसुळाट वाढला असून याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिर्डी पोलीस स्टेशनचीच असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मंगळवारी संध्याकाळी माळवे सराफ वर पडलेला दरोडा हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगतो आहे. पोलीस दूरक्षेत्राला कायमस्वरूपी असलेले कुलूप यामुळेच या परिसरात अवैध धंदे वाढले आहे. जनतेमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. तेव्हा शिर्डी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या हे पोलीस दुरक्षेत्र तातडीने सुरू करावे. अवैद्य धंद्यांना आळा घालण्यासाठी पावले उचलावीत. अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केली आहे.








