कपास कांती अभियानातून कापूस उत्पादनवाढीचा निर्धार
खिर्डी गणेश-येसगाव येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात
कोपरगाव समाचार : केंद्रीय पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान (कपास कांती) सन २०२५-२६ अंतर्गत खिर्डी गणेश व येसगाव येथे तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सघन लागवड पद्धती आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे हे उपस्थित होते. त्यांनी 'कपास कांती' अभियानाची उद्दिष्टे, सध्याच्या एल निनो (El Niño) परिस्थितीचा शेती क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम तसेच या आव्हानांवर मात करून कापूस उत्पादन वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना आणि आर्थिक बाबींची सविस्तर माहिती दिली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कापूस पीक शास्त्रज्ञ डॉ. एन. के. भुते यांनी कापूस पिकातील सघन लागवड, क्लोजर लागवड आणि पारंपरिक लागवड पद्धतींची तुलनात्मक माहिती दिली. त्यांनी विविध लागवड पद्धतींचे फायदे-तोटे, एमसीपी कापूस अभियानातील तांत्रिक बाबी तसेच अधिक उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव मनोज सोनवणे यांनी लाभार्थी निवड प्रक्रिया, अभियानाची अंमलबजावणी तसेच कापूस पिकातील योग्य लागवड अंतर आणि त्याचा उत्पादनवाढीवर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी एस. के. मलिक, मंडळ कृषी अधिकारी सौ. मोटे, उपकृषी अधिकारी एस. पी. घनकुटे, डी. एल. ठाकरे, सहाय्यक कृषी अधिकारी. नरेंद्र रामोळे, आत्मा अंतर्गत विषय तज्ज्ञ अविनाश निर्मळ तसेच कोपरगाव, कोळपेवाडी व पोहेगाव मंडळातील सर्व उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.येसगाव, खिर्डी गणेश, बोलकी, आंचलगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयोगशील शेतकरी मिलिंद लोखंडे, .अभिजित चोरगे, संदीप रोहोम, . संजय लोखंडे, कालिदास रोहोम तसेच उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी "अधिक उत्पादन, अधिक उत्पन्न आणि शाश्वत शेती" हा कापूस उत्पादकता अभियानाचा मुख्य उद्देश असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.








