भावाच्या त्यागातून बहिणीची भरारी
उषाताई पवार यांची तालुका पुरवठा अधिकारीपदी निवड
कोपरगाव समाचार:-जिद्द, अथक परिश्रम आणि कुटुंबाच्या त्यागाच्या बळावर कोणतेही यश संपादन करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कोपरगाव शहरातील उषाताई पवार. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, पत्र्याच्या छोट्याशा घरात राहून शिक्षण घेतलेल्या उषाताईंनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत तालुका पुरवठा अधिकारीपदी निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
उषाताईंच्या यशामागे कुटुंबाचा संघर्ष आणि त्यागाची प्रेरणादायी कहाणी दडलेली आहे. आईने झाडू काम करून संसार सांभाळला, तर भाऊ ज्ञानेश्वर पवार यांनी चप्पल-बूट शिवणे व पॉलिश करण्याचे काम करत स्वतःच्या कष्टाच्या पैशातून बहिणीचे शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत बहिणीच्या स्वप्नांना पंख देणारा हा भाऊ आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
“गरीबी आडवी आली तरी स्वप्नांना खीळ बसू दिली नाही,” हे उषाताई पवार यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सेवानिवृत्त अभियंता माधवराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी उषाताईंच्या जिद्दीचे कौतुक करत, “संघर्षातून उभे राहून मिळवलेले यश समाजाला दिशा देणारे ठरते,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
उषाताई पवार यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून संघर्षमय परिस्थितीतून मोठी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक युवक-युवतीसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरत आहे.
कोपरगावच्या मातीतून उमललेली ही यशोगाथा आज सर्वत्र अभिमानाने सांगितली जात आहे.






