संजीवनीच्या ब्रासबॅण्ड पथकाची राष्ट्रीय कामगिरी अभिमानास्पद-- पराग संधान
संजीवनीमध्ये वार्षिक क्रीडा बक्षिस वितरण सोहळा संपन्न
कोपरगांव समाचार :-- संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बॅण्ड पथकाने अवघ्या दोन वर्षात दाखविलेली चिकाटी, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर थेट राष्ट्रीय स्तरावर धडक मारली आहे, ही कामगिरी केवळ संस्थेसाठीच नव्हे, तर संपुर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. संजीवनी संस्थेमध्ये शिक्षणासोबतच क्रीडा, सांस्कुतिक आणि सहशैक्षणिक उपक्रमांना समान महत्व दिले जाते. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळत असुन त्यांच्यात नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होत आहे, असे प्रतिपादन कोपरगांव नगरपरीषदेचे नगराध्यक्ष श्री पराग संधान यांनी केले.
संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आयोजीत वार्षिक क्रीडा बक्षिस वितरण सोहळ्यात श्री संधान प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी व्यासपीठावर आखिल भारतीय पोलीस बॅण्ड पथकाचे राष्ट्रीय जज श्री अमर कुंभार, पीएसआय संतोश तडवी, नॉन अकॅडमिक डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर, कॅम्पस अॅडमिन विजय भास्कर, असिफ सय्यद उपस्थित होते. प्राचार्य दरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीके देवुन गौरविण्यात आले.
यावेळी श्री संधान यांनी संस्थेच्या नेतृत्वाचा उल्लेख करत सांगीतले की संजीवनी संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी घालुन दिलेला उत्कृष्टतेचा पाया तितक्याच ठामपणे पुढे नेला जात आहे. त्यांच्या पश्चात संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी तोच उत्कृष्टतेचा वसा अधिक व्यापक आणि परिणामकारक पध्दतीने पुढे चालु ठेवला असुन, त्यामुळे संजीवनीचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल होत आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुमित कोल्हे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षण क्रीडा तसेच जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सातत्य राखणे अत्यंत आवश्यक आहे. यश मिळो अथवा अपयश येवो, कधीही पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा कामाला लागण्याची जिध्द विद्यार्थ्यांनी अंगी बाणवावी. ब्रासबॅण्ड स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामागे पालकांचे योगदान अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी नमुद केले. क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ शारीरिक तंदुरूस्तीच नव्हे तर संघभावना, नेतृत्वगुण, शिस्त , सहकार्य, आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव विकसित होते. भविष्यात विद्यार्थ्यांसाठी साहसी खेळांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार असुन त्यामुळे विद्यार्थ्यांच्या धैर्य, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासात अधिक वाढ होईल.
संगीत शिक्षक महेश गुरव यांनी सेक्सोफोनवर गायीलेल्या वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.




