भाजप व मित्रपक्षांनी जनमानसात पुन्हा एकदा मजबूत मुसंडी - वैभव आढाव
कोपरगाव समाचार : -
कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजप व मित्रपक्षांनी जनमानसात पुन्हा एकदा मजबूत मुसंडी मारत आघाडी कायम राखली आहे. पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम पुढे गेल्याने विरोधकांना पराभवाची कारणे शोधण्याची आणि पिछाडी काहीशी सावरण्याची संधी मिळाली असली, तरी भाजप-कोल्हे कुटुंबाची विकासाभिमुख तयारी आणि जनतेशी असलेला थेट संपर्क यामुळे जनतेने ठरवले आहे यावेळी सत्ता आमच्याकडे पूर्ण ताकदीने द्यायची यामुळे संपूर्ण शहरात भाजप मित्रपक्षांची हवा अधिकच वेगाने वाहू लागली आहे अशी प्रतिक्रिया प्रभाग एकचे उमेदवार वैभव आढाव यांनी व्यक्त केली आहे.
दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, येत्या २० तारखेला सर्व उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदासाठी पराग संधान विक्रमी मतांनी विजयी होतील, असा ठाम विश्वास वैभव आढाव यांनी व्यक्त केला. विकास हीच प्रामाणिक भूमिका आणि कोल्हे कुटुंबाचे सातत्यपूर्ण जनसंपर्क या दोन गोष्टींमुळे शहरात सकारात्मक वातावरण अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक १ मध्ये तर विशेष उत्साह दिसून आला आहे. स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळे या भागाचा शहरामध्ये समावेश (हद्दवाढ) करण्यात आला आणि त्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, उद्याने आदी मूलभूत कामांसाठी मोठा मार्ग मोकळा झाला आहे. या भागाने मागील अनेक वर्षांपासून विकासासाठी प्रतीक्षा केली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रभागाला ठोस निधी मिळावा यासाठी भाजप-मित्रपक्ष सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
यामुळे सर्वच प्रभागातील मतदारांनी “विकासासाठी साथ” देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांमध्ये “ प्रमाणिक काम करणाऱ्यांनाच संधी” देण्याची भावना प्रबळ असून पुढील पाच वर्षे कोपरगावचा दर्जा उंचावण्यासाठी भाजप-मित्रपक्ष हेच सक्षम नेतृत्व असल्याचा विश्वास मतदारांनी दाखविलेला आहे.कोपरगावमध्ये विकासाचा मार्ग आता अधिक स्पष्ट होत असून, आगामी निकालात हा जनतेचा विश्वास विक्रमी मतांनी उमटणार यात शंका नाही.




