मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानातून ग्रामीण विकासाला चालना - परजणे
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा यांना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहीत करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास व पंचयतराज विभागामार्फत दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत " मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान " हाती घेतले असून या अभियानात संवत्सर ग्रामपंचायत राज्यस्तरावर अव्वलस्थानी येण्यासाठी ग्रामस्थांनी राजकीय मतभेद, गट तट बाजुला ठेऊन एकोप्याने काम करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी केले.
संवत्सर ग्रामपंचायतीच्यावतीने " मुख्यामंत्री समृध्द पंचायतराज अभियान " विषेश कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना परजणे बोलत होते. प्रारंभी उपसरपंच विवेक परजणे यांनी प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या अभियानाबाबतचे लाईव्ह टेलिकास्ट भाषण याप्रसंगी दाखविण्यात आले. सरपंच सौ. सुलोचना ढेपले, पंचायत समितीचे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पंडितराव वाघिरे, कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेव साबळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रध्दा काटे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ओंकार दिघे, ग्रामपंचायत अधिकारी कृष्णदास आहिरे, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती वाडेकर, डॉ. घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाने राज्यभरात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी सन २०२५- २६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरावर हे अभियान राबविण्यास मंजुरी दिलेली आहे. या अभियानासाठी राज्यासाठी सुमारे २९० कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद देखील केलेली आहे. ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५ कोटी. विभागीय स्तरासाठी १ कोटी, जिल्हास्तरासाठी ५० लाख, तालुकास्तरासाठी १५ लाख तर विशेष पुरस्कार ५ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप ठेवण्यात आलेले आहे असे सांगून श्री परजणे पाटील पुढे म्हणाले, संवत्सर ग्रामपंचायतीने जलसंवर्धनाबरोबरच वृक्षारोपण, रस्ते, वीज, शिक्षण, घरकुले, स्वच्छ पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ग्रामविकासाची बहुतांशी कामे परिसरात राबविलेली आहेत. गावाला यापूर्वी शासनाची पारितोषीकेही प्राप्त झालेली आहेत. ग्रामस्थांना त्यांच्या मुलभूत व आवश्यक गरजा पुरविण्यात संवत्सर ग्रामपंचायत सतत प्रयत्नशील राहिलेली आहे. भविष्यातही गावाचा अधिकाधीक विकास होण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियानात संवत्सर ग्रामपंचायत सहभाग घेणार आहे.
लोकसहभागातून गावांचा विकास हा मुख्यामंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा मुख्य उद्देश असून गांवांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आणि गावाचा शाश्वत विकास साधल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही. शाश्वत विकासामधूनच सध्याच्या पिढीबरोबर पुढील पिढ्यांच्या साधन संपत्तीचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. काळाची पावले ओळखून शासनाने हाती घेतलेल्या या अभियानातून ग्रामीण भागात आर्थिक समृध्दी पोहोचेल, गावाला विकासाची नवी उर्जा मिळेल आणि गावाची समृध्दीकडे वाटचाल होईल. लोकसहभाग या मुख्य उद्देशाबरोबरच लोकाभिमूख प्रशासन, नागरी सेवा सुविधा केंद्रांना सेवा केंद्रांचा दर्जा देणे, तक्रार निवारण, ग्रामपंचायत वेबसाईट, सीसीटीव्ही कॅमेरे, दप्तर व लेखे अद्ययावतीकरण, मतदार नागरीक ॲप डाऊनलोड करणे, आयुषमान भारत कार्ड वितरीत करणे, कर आणि पाणीपट्टी शंभर टक्के वसूल करणे, स्व - उत्पन्न वाढविणे, पिण्याचे शुध्द पाणी पुरविणे, नळपाणी योजना सक्षम करणे, स्ट्रीटलाईट थकबाकी शुन्य करणे, पंतप्रधान आवासची कामे पुढे नेणे, सर्व शासकीय संस्थांनी लोकसहभागासाठी प्रयत्न करणे अशा विविध विकास कामांचे गुणांकन या अभियानातून शासन त्रयस्थ यंत्रणेमार्फत करुन घेणार असल्याचे सांगून श्री परजणे यांनी संवत्सर ग्रामपंचायत गुणांकनामध्ये पात्र ठरण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासकीय यंत्रनेसोबत समन्वय साधून काम करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यशाळेस कोपरगांव बाजार समितीचे संचालक खंडू फेपाळे, लक्ष्मणराव साबळे, दिलीपराव ढेपले, चंद्रकांत लोखंडे, सोमनाथ निरगुडे, शंकररराव परजणे, लक्ष्मणराव परजणे, ग्रामपंचायत सदस्य तुषार बारहाते, सदस्य महेश परजणे, अनिल आचारी, अविनाश गायकवाड, बाबुराव मैद, बाळासाहेव दहे, ज्ञानदेव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, मुकुंद काळे, गणेश साबळे यांच्यासह ग्रामस्थ, महिला, प्राथमिक आरोग्य केंद्राचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.







